डिजिटल अर्काईव्ह

मग एस.एम.ला बोलायला दिले. ते दलित, महात्मा गांधी वगैरे बोलू लागताच, ‘अरे, याला बोलू देऊ नका. पोरांना ते पटलं तर घोटाळा होईल’, असे म्हणून गडबड आणि रेटारेटी सुरू झाली. पोलिसांनी पुढे येऊन मुलांना मागे रेटले. शेवटी शिष्टमंडळ वर न्यायचे आणि बोलणी करायची, असे ठरले. जाताना, ‘त्या एस.एम.ला आणखी थत्त्याला झेंड्यासमोर येऊन नाक घासायला लावा,’ अशी मागणी खालच्या पोरांनी केली. साधनाच्या हॉलमध्ये शब्दाशब्दी सुरू झाली. श्रीकांत शिरोळेनी सांगितले, ‘तुम्ही जे दलितबिलीत म्हणता, त्याचे इथे काही काढू नका. त्यांच्यासाठी आम्ही काय करायचे ते करू. राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे, त्याचे काय? त्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे.’ एस.एम. म्हणाले, ‘ती माफी यापूर्वीच मागितली आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?’ भीम बडदे आणि इतर काही म्हणाले, ‘नाही.’ एसेम म्हणाले, ‘तुम्ही वर्तमानपत्रेसुद्धा वाचत नाही, याला काय म्हणायचे?’   

साधनाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले. भाषणे झाली. ‘नव्या स्वरूपाला घाबरू नका, त्याला वाव द्या.’ अशा सुरांची भाषणे झाली. 15 ऑगस्टच्या अंकाचे कौतुकही झाले. नव्या स्वरूपाचे एवढ्या लवकर रौद्र स्वरूप दिसेल, असे त्या वेळी बोलणाऱ्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्या मनातही आले नसेल.

कुठल्याही संस्थेचा रौप्यमहोत्सव आला की, ती संस्था वर्तमानपत्रांना प्रसिद्धीसाठी फोटो-ब्लॉक्ससह मजकूर पाठवीत असते. साधनाला तशी जरुरी पडली नाही. गेले आठ-दहा दिवस रोज चढत्या क्रमाने बातम्या, स्फुटे आणि आता अग्रलेख येत आहेत. सर्व जनतेला साधना नावाचे साप्ताहिक निघते किंवा काहींना ते अजून निघते अशी माहिती रौप्यमहोत्सवानिमित्त मिळाली, हे एक बरेच झाले. या श्रेयाचे मानकरी बरेच आहेत. तूर्त त्यासाठी भांडू नये, हे बरे.

एकंदर प्रसंगाने आपल्या लोकांमध्ये राष्ट्रभक्ती किती ओतप्रोत भरली आहे, हेही समजून आले. आता आपल्या देशाला परचक्राची अजिबात भीती नाही. झाल्या प्रसंगाने आपली शेजारी राष्ट्रेसुद्धा हादरून गेली आहेत. असो.

 तर असे हे काही राष्ट्रभक्त तरुण रक्त पुण्यातल्या राहुल थेटरात दुपारी तीन वाजता जमले. त्या वेळेस योगायोगाने राजेश खन्नाचा ‘बावर्ची’ सिनेमा चालू होता. मग नाईलाजाने ते तरुण तिथे बसले. त्या सर्वांची तिकिटेही प्रेमापोटी एकाच माणसाने काढली म्हणतात. त्यांनी सिनेमा कसाबसा पाहिला. नंतर राष्ट्रगीत असते. त्याला उभे न राहता ते बाहेर पडले. केवढी अधीरता! बाहेर पडून त्यांच्या एकदम लक्षात आले की - ‘अरे, साधनात राष्ट्रध्वजाचा अपमान झालाय.’ साधना ही काय भानगड? प्रश्न गैरलागू. अपमान झालाय ना? बस्स. होळी करू. सळसळते तरुण रक्त राहुलसमोरच्या रस्त्यावरून वाहत शेतकी कॉलेज चौकात जाते. अंकाची होळी होते. होळी केली तो साधनाचा अंक होता, असे प्रमुख लोकांचे म्हणणे. पण तो प्रश्न दुय्यम. भावना महत्त्वाची. उद्या साधनावर मोर्चा न्यायचा - हा शेवटी निर्णय.

इकडे पुणे महानगरपालिका पाहा. त्यातले कर्तव्यदक्ष नगरपिते पाहा. अरेच्चा, साधना त्यांच्यापर्यंतही पोहोचली वाटते. काँग्रेसच्या शिवाजी मावळ्यांनी (पूर्वाश्रमी शिवसेना) तहकुबी मांडली. त्यावर भाषणे झडताहेत. ‘आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान? हात कलम केले पाहिजेत. चौकात फटके मारले पाहिजेत,’ इत्यादी. भाई वैद्य यांनी ‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान नसून, दलित तरुणाने व्यक्त केलेली तिडीक आहे’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. पेपर्स गाजू लागले. आज तहकुबी. उद्या होळी. परवा मोर्चा.

मोर्चा गुडलकपाशी जमणार होता. तिथून साधनावर. साधनाच्या आयुष्यातील अभूतपूर्व प्रसंग. मागे लता-हमीद विवाहाच्या वेळी आला होता तेवढाच.

रंगीबेरंगी कपड्यांतली पोरे जमत होती. चलो यार, होळी करेंगे. कसली होळी? कसली कुणास ठाऊक! काय घेणे आहे? चम्या म्हणतोय - ‘आपण त्याला शब्द दिलाय, जायला पाहिजे.’ हातात कडी, मनगटावर मोठे कातडी पट्टे. ‘जला दो, जला दो - साधना साप्ताहिक जला दो, यदुनाथ थत्त्याला शासन करा,’ इत्यादी.

मोर्चात दीड-दोनशे मंडळी. एकाला वाटले, साधना नटीनेच राष्ट्रध्वजाचा अपमान केला. तो म्हणाला, ‘सालं, काय नडलं होतं तिला असं करायचं? पण मग हा यदुनाथ थत्ते कोण? जाऊ दे. पुढं बघू काय होतंय ते.’

मोर्चा येणार हे पाहायला साधनासमोरही बरीच गर्दी जमली होती. साधनासमोर पोलीस चौकी आहे. कधी कधी तिथे कोणाला धरून आणले की, खिडकीतून बघायला थोडी गर्दी होते. बाकी एरवी नसते. किंवा समोर वीराचा मारुती आहे तिथे. पण आजची गर्दी वेगळीच. काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता. सायकलवर चालताना एक माणूस थांबला आणि ‘काय भानगड आहे?’ विचारू लागला. सांगितली. आणि विचारले, ‘तुम्हाला काय वाटलं होतं?’ तो म्हणाला, ‘मला वाटलं, काय मयत-बियत झालीये का काय!’

तिकडे मोर्चामध्ये मुलांनी तिरडी तयार केली होती. त्यावर पालथी टोपली, त्याभोवती सायकलचे जुने टायर, एक पोरगा उघडा होऊन डोक्याला रुमाल गुंडाळून चालला होता. त्याच्याभोवती पोरं नाचत होती. तिरडीच्या मागे दोन पोरं चपलांनी वारा घालत चालली होती. आजच्या अभिनव मोर्चाचा आनंद भन्नाटच. मॅटिनी बुडाली, दुःख वाटत नाही. गर्जत-गर्जत मोर्चा साधनापाशी आला. मोर्चात पुढाकार काँग्रेसचे तरुण कॉर्पोरेटर श्रीकांत शिरोळे, जयप्रकाश वाळके, श्री.कपोते आणि जनसंघ युवक आघाडीचे भीम बडदे यांचा. एमईएस कॉलेज आणि अभाविपचीही काही मंडळी दिसत होती. कपोते त्यात असणे साहजिकच, कारण ते पाषाणच्या नेहरू शिक्षण संस्थेच्या संकपाळचे उजवे हात. ट्रस्टी. त्यांना विचारले, ‘तुम्ही कसे काय यात?’ ते म्हणाले, ‘वा! आम्ही यात पहिल्यापासूनच.’ शिरोळे असणे हेही साहजिकच, कारण साधनातील काही लिखाण शिरोळेलाईनला विरोधी जाणारे.

मोर्चा येण्यापूर्वी पोलीस बऱ्याच संख्येने साधनाजवळ जमले होते. अगदी बोळात एक व्हॅन उभी होती. त्यात रायफलधारी पोलीस आणि अश्रुधुराच्या बाटल्या होत्या. तयारी जय्यत होती. एस.एम., यदुनाथ खाली येऊन थांबले होते. एक इन्स्पेक्टर एस.एम.ना म्हणाला, ‘दार लावून घ्या.’ एस.एम. म्हणाले, ‘नको. त्यांना यायचे असले तर खुशाल येऊ द्या. आम्हाला कसली भीती नाही.’

मोर्चा आला. घोषणा सुरू झाल्या. मोर्चाबरोबर दोन राष्ट्रध्वज काठीवर नाचवत आणले होते. ते उभे केले गेले. तिरडी पेटवली गेली. ‘यदुनाथ थत्त्याला खाली आणा,’ अशा घोषणा सुरू झाल्या. थत्ते त्यांच्यासमोरच उभे होते. पोरांना लोकांनी सांगितले की, ‘हे थत्ते.’ तेव्हा त्यांना पटले नाही. कारण घोषणा देऊन-देऊन थत्त्यांची जी इमेज त्यांच्या मनात तयार झाली होती, ती अशी नव्हती.  

भाषणे सुरू झाली. ऐकायच्या मन:स्थितीत कोणी नव्हते. पण काही वेळाने भाषणे ऐकू येऊ लागली. श्रीकांत शिरोळे म्हणाले, ‘राष्ट्रध्वजासाठी आम्ही (स्वतःच्या छातीवर हात मारून) या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत.’ माझ्या माहितीप्रमाणे सत्तेचाळीस साली शिरोळे चार वर्षांचे असतील! या चार वर्षांच्या लहानग्या मुलाने छातीवर गोळ्या झेलल्या असतील, तर त्याचे नाव कसे कुठे झाले नाही? छे, छे! ही चूक सुधारली पाहिजे. ताम्रपटाने भागायचे नाही, इंदिराजींनी त्यांना सुवर्णपटच दिला पाहिजे.

नंतर वाळके- ‘यांना चौकात फटके मारले पाहिजेत. शनिवारवाड्यावर नागवे केले पाहिजे. सरकारने यांना शासन केले नाही तर आम्ही यांना करू. साधना प्रेस आम्ही जाळून टाकू.’

नंतर भीम बडदे- हातात कातडी पट्टा. पीळदार शरीर. हात उभारून भाषण. ‘आमचा राष्ट्रध्वज? अपमान सहन करणार नाही. या झेंड्यासाठी झाशीच्या राणीने... (पुढे झाशीच्या राणीने काय केले हे आठवत नसावे) .. आपले तान्हे मूल रडत असताना लढाई केली.’ (काय हे! मूल रडत होते हा पॉइंट आजवरच्या इतिहासकारांच्या नजरेतून कसा सुटला? राष्ट्रभक्ती जरा कमीच पडते या लोकांची.)

 मग एस.एम.ला बोलायला दिले. ते दलित, महात्मा गांधी वगैरे बोलू लागताच, ‘अरे, याला बोलू देऊ नका. पोरांना ते पटलं तर घोटाळा होईल’, असे म्हणून गडबड आणि रेटारेटी सुरू झाली. पोलिसांनी पुढे येऊन मुलांना मागे रेटले. शेवटी शिष्टमंडळ वर न्यायचे आणि बोलणी करायची, असे ठरले. जाताना, ‘त्या एस.एम.ला आणखी थत्त्याला झेंड्यासमोर येऊन नाक घासायला लावा,’ अशी मागणी खालच्या पोरांनी केली.

साधनाच्या हॉलमध्ये शब्दाशब्दी सुरू झाली. श्रीकांत शिरोळेनी सांगितले, ‘तुम्ही जे दलितबिलीत म्हणता, त्याचे इथे काही काढू नका. त्यांच्यासाठी आम्ही काय करायचे ते करू. राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे, त्याचे काय? त्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे.’ एस.एम. म्हणाले, ‘ती माफी यापूर्वीच मागितली आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?’ भीम बडदे आणि इतर काही म्हणाले, ‘नाही.’ एसेम म्हणाले, ‘तुम्ही वर्तमानपत्रेसुद्धा वाचत नाही, याला काय म्हणायचे?’

तेवढ्यात नरुभाऊ लिमये आले. तेव्हा भीम बडदे बोलत होते. ‘असा अपमान आम्ही सहन करणार नाही’ वगैरे. त्याला समजावले की, ‘कोणाला तू हे सांगतोस? एसेमना? अरे, त्यांनी या राष्ट्रध्वजासाठी काय केले, हे माहीत आहे का?’ तो म्हणाला, ‘माहीत आहे. पण म्हणूनच आम्ही म्हणतो की, हा अपमान त्यांनी का केला? आमच्या भावना तुम्हाला समजत नाहीत.’ नरुभाऊ म्हणाले, ‘या भावनाही आपल्याला एसेमनी शिकवल्यात.’ त्यावर भीम म्हणाला, ‘म्हणूनच म्हणतो की, हा अपमान त्यांनी काय म्हणून केला?’

एकंदरीत भीमाचे शरीरच ताठ होते असे नाही, तर डोकेही पीळदारच होते. ‘बरं, मग थत्त्यांनी तरी खाली येऊन झेंड्यापुढे साष्टांग नमस्कार घातला पाहिजे.’ नरुभाऊ म्हणाले, ‘हा त्यांचा अपमान आहे. आपण सर्वच जण खाली जाऊन झेंड्याला नमस्कार करू.’ जाताना एसेमनी शिरोळेला सांगितले की, गांधी म्हणतात की- ‘त्या अस्पृश्य लोकांवर आम्ही इतके जुलूम केले आहेत की, ते आमच्या तोंडावर थुंकले तरी आम्ही काही म्हणता कामा नये.’

शेवटी सर्व खाली गेले. खाली चुळबुळ. काहींच्या तोंडी- थत्त्यांना खाली बोलवा, वाटाघाटी कसल्या करता?

थत्ते पुढे जाताच रेटारेटी झाली. तिरडीची राख कुणी तरी त्यांच्या तोंडाला फासण्याचा प्रयत्न केला. त्याला श्रीकांत शिरोळेने अडविण्याचा प्रयत्नही केला. शिष्टमंडळातले नेते ओरडून सांगायचा प्रयत्न करीत होते. कोणी ऐकत नव्हते. यदुनाथ थत्ते यांनी राष्ट्रध्वजाला एकट्यानेच शिस्तीने प्रणाम केला. काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काहींना वाटले, राष्ट्रध्वजाला प्रणाम करण्यात गैर काहीच नाही. पण दांडगाईपुढे शरणागती अशा स्वरूपात प्रणाम केला गेला, असे कोणी म्हटले तर त्याचा प्रतिवाद करता येणे कठीण. तेवढ्यात कुणी तरी राष्ट्रगीत म्हटले. सर्व म्हणू लागले. संपल्यावर पांगापांग झाली.

एकंदरीत साधनात धमाल चालली होती. माफ्या, राजीनामे, खुलासे यांची खैरात चालली होती. कुणी म्हणाले, ‘आता आत्महत्याच कमी आहेत.’ रोज कुणी येऊन शिकवून जात असे. एक म्हणाले, ‘राजीनामे द्या. शास्त्रींचे कौतुक कशाला करता? दिलगिरी ही पळपुटेपणाची आहे.’ (शास्त्रींच्या राजीनाम्याने मोठा घोटाळा करून ठेवलाय. जरा कोणी चुकले की, हे उदाहरण देऊन  राजीनाम्याची मागणी करता येते.) दुसरे म्हणाले, ‘राजीनामे का दिले? हा पळपुटेपणा आहे.’ या सगळ्यात राजा ढाले कुठे राहिला? पण तो पडला दलित. त्याला उघडपणे ठोकता येत नव्हते. ‘तो लेख खूप लिहील, तुम्ही कसा छापला?’ असे बहुतेकांचे म्हणणे असे.

दुर्गाबाईंसंबंधीच्या विधानाचेही तेच. कोणी येऊन म्हणे, ‘अरे, या पोरांना (ढाले ग्रुपला) आईच्या मायेने ही बाई वागवते, तिच्याविषयी असे उद्‌गार?’ कोणी म्हणे- ‘काय बिघडले? भंग्याच्याविषयी बोलणाऱ्यांना आपण नाही का म्हणत- की स्वतः खराटा हाती धरून बघा आणि मग बोला.’

माझ्या दृष्टीने दुर्गाबाईंना ‘वेश्या या वेश्याच राहायला हव्यात’ असे मुळात म्हणायचेच नाही. समाजात आज घटकेला वेश्या आहेत. त्या आमच्या समाजाची गरज भागवीत आहेत. त्यांना हीन समजू नका. त्यांना सोई उपलब्ध करून द्या- असे आहे. अनंत काळपर्यंत वेश्या व्यवस्था राहावी, असे त्यांनी कुठेही म्हटले नाही. पुन्हा दलित आणि वेश्या यांचेही काही समीकरण नाही. असे असता, ‘असे म्हणणाऱ्यांनी स्वतः धंदा का करू नये?’ असा एखाद्या समाजशास्त्रज्ञ स्त्रीला गप्प करणारा प्रश्न विचारणे अन्यायकारक आहे. त्या वाक्यात भागवतबाई असा उल्लेख असल्यामुळे दुर्गा भागवत असे पटकन्‌ ध्यानात आले नाही, म्हणून हा घोटाळा झाला. त्याबद्दल मी दिलगिरी मागितली आहेच.

राष्ट्रध्वजाविषयी कोणी शांतपणे विचार करायला तयार नव्हते. प्रतीके ही माणसांनी माणसांसाठी तयार केली आहेत. वरिष्ठ माणसांनी माणुसकी सोडली तर ज्याच्यावर पिढ्यान्‌पिढ्या जुलूम झाला आहे, त्यांनी त्यांच्या भाषेत निषेध नोंदविला तर काय गैर आहे, हेच कळत नाही. (ढाले आणि त्यांचे मित्र यांची हीच भाषा आहे, हे मला माहीत आहे. त्यांच्या दृष्टीने या शब्दाला आपल्याला वाटतो तितका भयंकरपणा नाही.) भाषा भडक आहे. पण तिच्यात ध्वजाचा अपमान करण्याचा हेतू नाही, असे वाटते. आणि दुसरे असे की, या अंकात या समाजाविषयी अस्पृश्य तरुण काय बोलतात, हेच दाखवायचे होते. दुर्गा भागवतांचा वैयक्तिक उल्लेख गाळायला हवा होता, हे समजू शकते. पण राष्ट्राविषयी आणि समाजाविषयी ते बोललेले आम्ही संपादित केले असते तर, तो दलितांवरचा आणखी एक अत्याचारच ठरला असता.

‘असे शब्द वापरून मूळ जे दुखणे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, ते पोचत नाही. त्याबाबत दक्षता घ्यायला पाहिजे होती,’ असे त्यांचे म्हणणे होते. एस.एम. म्हणत होते की, ‘दलितांच्या अत्याचाराविरुद्ध लढणारे आणि राष्ट्रध्वजाला पवित्र मानणारे बरेच लोक आहेत, त्यांची आपण माफी मागितली पाहिजे.’ झाल्या प्रकाराला आपण संपादक म्हणून जबाबदार आहोत (जरी नैतिक दृष्ट्या मी जबाबदार असलो तरी), म्हणून यदुनाथजींनी राजीनामा दिला. दिला हा त्यांचा मोठेपणा. पण खऱ्या अर्थाने माझ्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला. हे मला बरे वाटेना, म्हणून मीही राजीनामा दिला.

अहिल्या आश्रमाचे आवार. इथून दलितांचा मोर्चा निघणार होता. परवाच्या काँग्रेस-जनसंघी मोर्चाच्या स्वरूपामुळे सर्वच जण खडबडून जागे झाले होते. पहिल्या-पहिल्यांदा साधनाविरुद्ध असलेली लोकांची मने आता अनुकूल होऊ लागली होती. एस.एम.सारख्यांना ही मवाली पोरे राष्ट्रध्वजाचे पावित्र्य शिकवतात, हे सर्वसाधारण माणसाला बरे वाटेना. दलित लोकांना तर असे वाटू लागले की, ‘साधना आपले साहित्य प्रसिद्ध करते आणि हे स्पृश्य लोक त्यावर दडपण आणतात.’ म्हणून त्यांनी साधनावर दलितांचा मोर्चा आणायचे जाहीर केले. विशेषतः ‘दडपणाला बळी पडू नका. थत्ते, अवचट यांचे राजीनामे स्वीकारू नका.’ मोर्चात दीड-दोनशे लोक. अरुण शेंडगे हा मातंग, तर जयदेव गायकवाड, सावंत आदी ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडन्ट्‌स असोसिएशन’ नावाच्या बौद्ध तरुणांच्या संघटनेतले तरुण आणि महात्मा फुले हायस्कूलमधील मुले. शिवाय भीमराव पाटोळे हा मेहतर समाजातला समाजवादी पक्ष कार्यकर्ताही होता. दोन-चार मुलीही. परवासारखीच साधनासमोर गर्दी होती. पण परवाचा ताण नव्हता. कॉर्पोरेटर कल्याणकर, ठकसेन पाडळे आदी मंडळी मोर्चाची वाट पाहत उभी होती. शेवटी मोर्चा आला. त्याचे सभेत रूपांतर झाले. ‘हमारी साधना- नहीं जलेगी, साधना जलानेवाले- सामने आव’ इत्यादी आव्हाने-प्रतिआव्हानेही झाली. भीमराव पाटोळे बोलले की, ‘साधनास जाळायला याल तर आम्ही असंख्य दलित तरुण या चौकात आत्माहुती करायला तयार आहोत.’ कुणी म्हणाले, ‘यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आहे.’ (मला कळले नाही. कदाचित त्याला स्पृश्य-स्पृश्येतर म्हणायचे असावे) वक्त्यांमध्ये बावडा, ब्राह्मणगाव, नागपूर अशा गावांची नावे हटकून येत. (आपले दुर्दैव असे की, ही यादी वाढतच चालली आहे) जयदेव गायकवाड नावाचा संतप्त बौद्ध तरुण भडकून बोलला, ‘ही साधना आमची आहे. आमचा आवाज उठवीत आहे. ती बंद करणारा जन्माला यायचाय,’ इत्यादी. मधेच ठकसेन पाडळे घुसले आणि बोलले, ‘परवा काँग्रेसवाल्यांची आणि त्यांच्या रांडाची पोरं इथे आली होती.’ सर्वांचे चेहरे असल्या भाषणामुळे पडले. पण थोडक्यात संपले ते बरे झाले. अरुण शेंडगे, अरुण लिमये हेही बोलले.

शेवटी एस.एम. उभे राहिले. ‘साधना ही दलितांचा आवाज उठवायला निघाली आहे. हा आवाज कोणी बंद पाडू शकणार नाही. तुम्ही तिरडी जाळाल, साधना प्रेस जाळाल; पण आमचे विचार तुम्ही जाळू शकणार नाही. एक वेळ साधना बंद पडली तरी चालेल, पण दलितांचा आवाज उठवण्याचे कार्य आम्ही सोडणार नाही.’ मग शेवटी त्यांनी घोषणा केली की, ‘संपादकांचे राजीनामे आम्ही स्वीकारणार नाही.’ यावर टाळ्यांचा कडकडाट. मग पोरांमधून यदुनाथ थत्त्यांची मागणी आली. तेही दोन शब्द बोलले. ‘आपण विश्वस्तांच्या म्हणण्याबाहेर नाही’ असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम संपला. आता सरकारने संपादक व लेखकावर गुन्हा दाखल केला असल्याची वार्ता वर्तमानपत्रात वाचण्यात आली असून, तूर्त पूर्णविराम दिला आहे.

(9 सप्टेंबर 1972 च्या ‘साधना’ अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)

Tags: निरुभाऊ लिमये आंदोलन मोर्चा श्रीकांत शिरोळे साने गुरुजींची साधना दुर्गा भागवत राष्ट्रध्वज अपमान बावर्ची सिनेमा राजेश खन्ना साधना साप्ताहिक कॉंग्रेस शिवसेना एस.एम.जोशी अनिल अवचट यदुनाथ थत्ते Narubahu Limaye Andolan Morcha Shrikant Shirole Sane Gurujinchi Sadhana Durga Bhagwat Rashtrdhwaj Apman Baavrchi Cinema Rajesh Khanna Sadhna Saptahik Congress Shivsena S.M.Joshi Ydunath Thatte Anil Avchat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनिल अवचट ( 104 लेख )
aawchat@gmail.com

पत्रकार, लेखक, समाजसेवक


Comments

  1. Suryakant vaidya- 05 Feb 2022

    सलाम साप्ताहिक साधनेला व अनील अवचटला ! माझ्या सारख्या ला एकदम भूतकाळात नेऊन तरूण करून टाकलंय !!

    save

  1. Girish Wagle- 07 Feb 2022

    इतका प्रभावी लेख जसे काही आत्ताच घडते आहे त्याचे समालोचनच! आपल्या विशेषंकाची आतुरतेने वाट पहात आहे.

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी