अंनिसच्या मदतीने आम्ही शंभर हुशार मुले व शंभर मतिमंद मुले यांची आवश्यक ती माहिती मिळवली आणि घाटपांडे यांनी ती माहिती वापरून त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या. सर्व पत्रिकांचे सांकेतिक रेकॉर्ड सुधाकर कुंटे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय कुठली कुंडली कोणाची, हे सांगणे शक्य नव्हते. आता प्रयोगाची सुरुवात म्हणून आम्ही चौघांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली.दि.12 मे 2008 रोजी. प्रयोगाची थोडक्यात पण आवश्यक इतकी माहिती देऊन आम्ही व्यावसायिक फलज्योतिषांना आवाहन केले की, त्यांनी ह्या प्रयोगात भाग घ्यावा. त्यासाठी खालील क्रिया अपेक्षित होत्या.
नरेंद्र दाभोलकर आणि अंनिसबरोबर एका प्रयोगात भाग घ्यायचा योग मला 2008 मध्ये मिळाला होता, हा लेख त्या अनुभवावर आधारित आहे. भारत हा अंधश्रद्धांचा देश आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. ज्याप्रमाणे विचारस्वातंत्र्यामुळे इथे विविध धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान आदींना आसरा मिळाला; त्याचप्रमाणे अंध विश्वासांनादेखील खतपाणी मिळाले. फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा उगम मुळात भारतात झाला नसला, तरी त्यात लक्षणीय वाढ इथेच झाली. आज फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या भारतात जेवढी आहे तितकी जगातल्या बाकीच्या सर्व देशांत मिळूनही नसावी. अंधश्रद्धांना आवर घालणारा प्रमुख उपाय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे. हा दृष्टिकोन विज्ञानातून उद्भवला असला तरी त्याचा वापर इतर क्षेत्रांत, दैनंदिन जीवनात होऊ शकतो. जर एखादे विधान ठामपणे एखाद्या अधिकारी व्यक्तीने केले, तर ते विश्वासार्ह असेलच असे नाही. त्याची स्वतंत्रपणे तपासणी, शहानिशा करूनच ठरवावे, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो.
उदाहरणार्थ- लग्न यशस्वी की अयशस्वी होईल, हे पत्रिका जुळतात का नाही यावरून ठरते, असे फलज्योतिष सांगते. हे विधान प्रयोगांनी तपासता येईल. लग्न जुळून यशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या आणि लग्ने अयशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या मिसळून (पत्ते पिसावेत तसे) फलज्योतिषतज्ज्ञांना तपासायला द्याव्यात. त्यांनी पत्रिका जुळणे, न जुळणे याबद्दलचे आपले निकष लावून कुठली लग्ने यशस्वी ठरली आणि कुठली नापास झाली, ते सांगावे. त्यांचे निदान वस्तुस्थितीप्रमाणे आहे की नाही, ते संख्याशास्त्राचे नियम ठरवतील. पाश्चात्त्य फलज्योतिषाची तपासणी करायला अमेरिकेत असा प्रयोग केला गेला आणि त्यात फलज्योतिष नापास ठरले. पत्रिका जुळणे, न जुळणे ह्याचा भारतात लग्न ठरवण्यासाठी पुष्कळ उपयोग होतो, म्हणून अशी तपासणी भारतात होणे आवश्यक आहे.
परंतु वैज्ञानिक तपासणी अशी असावी की, त्यात पळवाट असता कामा नये. लग्न यशस्वी, अयशस्वी होणे म्हणजे नेमके काय? एकत्र राहणारे दांपत्य, मराठी छत्तीस आकड्याप्रमाणे विरुद्ध दिशांना जाऊ इच्छिणारे, लग्न अयशस्वी असल्याची ग्वाही देते. त्यामुळे घटस्फोट नसूनही लग्न ‘अयशस्वी’ म्हणायला पाहिजे. असे अनेक प्रश्न उद्भवतात. म्हणून ही चाचणी पुष्कळ विचारपूर्वक घ्यायला हवी. मी या विवंचनेत असताना नरेंद्र दाभोलकर माझ्या मदतीला आले. पत्रिका जुळणे, न जुळणे याला सोपा पर्याय त्यांनी सुचवला, तो असा.लग्न झालेल्या/मोडलेल्या जोडप्यांऐवजी हुशार/मतिमंद अशा मुलांची चाचणी घ्यावी. ‘हुशार’ हे विशेष शाळेत त्या मुलाच्या कीर्तीवरून ठरवणे सोपे आहे. त्याचप्रमाणे मतिमंद मुलाच्या शाळेत त्यांची माहिती मिळू शकते. एकूण, इथे शंका घ्यायला जागा नाही. तसेच फलज्योतिषांचा दावा असतो की, जन्मपत्रिकेमधून सांगता येते की, ज्याची ती पत्रिका आहे तो विद्यार्थी हुशार आहे की मतिमंद. तपासणीच्या प्रयोगासाठी दाभोलकरांनी अंनिसच्या मदतीने ही माहिती गोळा करायची तयारी दाखवली.
यापुढे जाण्यासाठी आम्हाला आणखी दोन सहकारी हवे होते. पुणे विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक सुधाकर कुंटे यांनी प्रयोगाची एकंदर आखणी आणि कृतीबाबत मार्गदर्शन करायची जबाबदारी स्वीकारली. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती (जन्मवेळ, जन्मस्थान आदी) घेऊन त्याची पत्रिका बनवायचे काम प्रकाश घाटपांडे यांनी अंगावर घेतले. घाटपांडे पूर्वी स्वत: फलज्योतिषाचा व्यवसाय करत; पण नंतर त्यातील सत्याचा अभाव व अविश्वासार्हता पाहून त्यांनी तो सोडून दिला आणि ते त्याचे टीकाकार झाले. अंनिसच्या मदतीने आम्ही शंभर हुशार मुले व शंभर मतिमंद मुले यांची आवश्यक ती माहिती मिळवली आणि घाटपांडे यांनी ती माहिती वापरून त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या. सर्व पत्रिकांचे सांकेतिक रेकॉर्ड सुधाकर कुंटे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय कुठली कुंडली कोणाची, हे सांगणे शक्य नव्हते. आता प्रयोगाची सुरुवात म्हणून आम्ही चौघांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली.दि.12 मे 2008 रोजी. प्रयोगाची थोडक्यात पण आवश्यक इतकी माहिती देऊन आम्ही व्यावसायिक फलज्योतिषांना आवाहन केले की, त्यांनी ह्या प्रयोगात भाग घ्यावा. त्यासाठी खालील क्रिया अपेक्षित होत्या.
1. भाग घेणाऱ्याने स्वत:ची व्यावसायिक माहिती आणि तिकीट लावलेले रजिस्टर्ड पोस्टाचे पाकीट आपल्या पत्त्यासकट पाठवावे.
2. भाग घेणाऱ्या प्रत्येकाला आम्ही 40 पत्रिकांचा सेट पाठवू. हा सेट यादृच्छिकपणे (रॅन्डम) मूळ 200 पासून काढलेला असेल. स्पर्धकांच्या पत्त्यावर सेट पाठवण्यात येईल.
3. स्पर्धकाने त्याच्या सेटमधील कुंडल्यांचा अभ्यास करून प्रत्येक कुंडलीवर ती हुशार मुलाची आहे की मतिमंद मुलाची आहे, ते त्यावर लिहून आमच्याकडे पाठवावे. पत्ता डॉ.कुंटे यांचा.
4. संख्याशास्त्राचे निकष लावले, तर ‘पत्रिकेवरून हुशार/मतिमंद हे निदान करता येते’ हा निष्कर्ष काढायला 40 पैकी कमीत कमी 28 भाकिते किंवा पत्रिकेनुसार वर्णने बरोबर यायला पाहिजेत.
वरील (4 खाली दिलेली) अटी समजावून घ्यायला कल्पना करा की, फलज्योतिष न वापरता तुम्ही असे ठरवले की; एक नाणे टॉससाठी फेकून ‘हेड’ आले तर हुशार आणि ‘टेल’ आले तर मतिमंद असा निर्णय घ्यायचा. असे असेल, तर सरासरी निम्मे 40 पैकी 20 बरोबर येतील. तुमच्यात खरोखर भाकीत करायची करामत असेल, तर तुमचा निकाल याहून जास्त पाहिजे. किती जास्त? संख्याशास्त्रज्ञांच्या मते 40 पैकी 28. असा निकाल यादृच्छिकपणे नाणेफेकीतून मिळण्याची संभाव्यता अर्धा टक्का असेल. त्यामुळे असा निकाल यादृच्छिकपणे येणार नाही. तो मिळवणाऱ्याकडे भाकीत करायची खास शक्ती असावी, असे समजायला जागा आहे. पण प्रत्यक्षात काय झाले? ह्या प्रयोगात भाग घेण्यासाठी 51 फलज्योतिष तज्ज्ञांनी रजिस्टर्ड पाकिटे पाठवली. पण त्यांपैकी 27 स्पर्धकांनी उत्तरे पाठविली. त्यात सर्वोच्च रेकॉर्ड 40 पैकी 24 बरोबर त्यापाठोपाठ दोघांचे 40 पैकी 22 बरोबर. म्हणजे 40 पैकी 28 ही ‘पास’ व्हायची लाइन कोणीही ओलांडू शकला नाही. सर्व 27 स्पर्धकांच्या मार्कांची सरासरी 40 पैकी 17.25 होती. म्हणजे, नाणेफेकीतून यापेक्षा अधिक मार्क मिळाले असते.
आम्ही फलज्योतिषाला वाहिलेल्या संस्थांना पण आवाहन केले होते की, तुम्ही संस्थेतर्फे भाग घ्या; आम्हीही तुम्हाला सगळ्या (200) पत्रिका देतो. फक्त एका संस्थेने भाग घेतला. त्यांना 200 पैकी 102 मार्क मिळाले. इथे कमीत कमी अपेक्षा होती जवळजवळ 118 मार्कांची. ह्या संदर्भात दाभोलकरांची भूमिका अशी होती. काही फलज्योतिषात पुढे आलेले लोक अशी शंका घेऊ लागले की, अंनिस अंधश्रद्धाविरोधात असल्याने त्यांनी गोळा केलेला डेटा तटस्थ असणार नाही. एका फलज्योतिषाच्या परिसंवादात अशी शंका व्यक्त करण्यात आली, तेव्हा दाभोलकरांनी स्वत: सौम्य शब्दांत ग्वाही दिली की, अंनिसतर्फे डेटा गोळा करताना तटस्थता पाळली गेली. शिवाय, त्यापुढची कार्यवाही डॉ.कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने तिथे अंनिसचा प्रभाव असणार नाही. विरोधकांशी वाद घालताना नरेंद्र दाभोलकरांची वृत्ती कधीही आक्रमक नव्हती.
वरील परिणाम जाहीर झाले; तेव्हा काही फलज्योतिषी म्हणू लागले की, ज्या स्पर्धकांनी भाग घेतला ते निष्णात फलज्योतिषी नव्हते; म्हणून निकाल फलज्योतिषाविरुद्ध लागला. पण आमच्याकडे जे 51 स्पर्धक प्रथम आले, त्या सर्वांनी स्वत:चा अनेक वर्षांचा त्या विषयाचा अनुभव मांडला होता. शिवाय एका संस्थेने भाग घेतला, त्याचे काय? त्या संस्थेतील सगळे सदस्य फलज्योतिषी नव्हते का? या धर्तीवर आणखी प्रयोग करता येण्याजोगे आहेत. खुद्द नरेंद्र दाभोलकरांचा त्याला पाठिंबा होता. त्यांच्या पश्चात इतर सत्यशोधक त्यासाठी पुढे येतील, अशी आशा आहे.
Tags: प्रकाश घाटपांडे सुधाकर कुंटे फलज्योतिष्य वैज्ञानिक दृष्टीकोन डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलन समिती प्रयोग जयंत नारळीकर Prakash Ghatpande Sudhakar Kunte Faljyotishy Vaidnyanik Drustikon Dr. Narendr Dabholkar Andhshrddha NIrmulan Samiti Pryog Jayant Narlikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या