डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

स्वागतार्ह आणि अभिमान वाटावा अशी गोष्ट

बहिणाबाईंचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यामागे राजकीय-सामाजिक समीकरणे असणार नाहीत, असे होऊ शकत नाही. भारतीय लोकशाही अद्याप इतकी प्रगल्भ झालेली नाही. ती जात, धर्म, प्रदेश, भाषा या संदर्भात गटांगळ्या खात असते. हे वास्तव असले तरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देणे स्वागतार्हच आहे. काही लोक याकडे जातीच्या संदर्भातून पाहतील आणि सुखावतीलही, आपण मात्र त्या पलीकडे पाहायला हवे, असे वाटते. याच दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडेही पहावे लागेल. कारण या विद्यापीठांच्या नामांतराच्या मुळाशी जसे राजकीय संदर्भ आहेत, तसे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संदर्भही आहेत आणि ते दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. किंबहुना सामाजिक जीवनात ते अटळ आणि अपरिहार्य आहेत.

विधिमंडळाच्या अधिवेशनात मागच्या आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा केली. या घोषणेबद्दल महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली नाही. घोषणेचे स्वागतच करण्यात आले. विधिमंडळात चर्चेदरम्यान मुक्ताईनगरचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ही मागणी लावून धरली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या मागणीसंदर्भात शासन सकारात्मक आहे असे सांगितले. तेवढ्याने खडसे यांचे समाधान झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा करावी असा त्यांनी आग्रह धरला आणि एकूण वातावरणाचा नूर पाहता मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. विधिमंडळातील सदस्यांनी बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले. आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याबाबत व अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याबाबत, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराबाबत सरकारची वेळ चुकली, पण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामांतराबाबत असे झाले नाही.

एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रभावी आमदार. मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजलेली. मुख्यमंत्रीपदाचे ते दावेदार, पण ते पद न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे व्यक्तही केली. पण भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड खरेदी घोटाळा त्यांना भोवला आणि मंत्रीपदाचा त्याग त्यांना करावा लागला. चौकशी समित्या, न्यायालयीन प्रक्रिया यांना सामोरे जावे लागले, पण त्यांचे पुनर्वसन काही झाले नाही, कधी होईल ते सांगता येत नाही. या नाराजीतून ते स्वपक्षीयांवर, सरकारवर संधी मिळेल तेव्हा हल्ला करीत असतात, सरकारला कोंडीत पकडतात. परवाचा कागदी उंदरांचा घोटाळा त्यांनी असाच उघडकीस आणला. खडसे सत्तेत असते तर त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला असता का? असा प्रश्न विचारण्यात हशील नाही. मुद्दा असा की, उपद्रवमूल्य असणाऱ्या खडसे यांनी विद्यापीठ नामांतराचा आग्रह धरला आणि मुख्यमंत्र्यांनी तो मान्यही केला.

या सगळ्यांमध्ये राजकारण आहेच. ते नाकारून चालणार नाही, पण विद्यापीठ नामांतराचा विचार त्याही पलीकडे करायला हवा. विद्यापीठासारख्या संस्थांचे जेव्हा नामकरण किंवा नामांतर होते, तेव्हा ते अनेक दृष्टीने महत्त्वाचे असते.  प्रतिभावंताचे नाव देण्यामागे एक अन्वर्थकता असते. बहिणाबाई ही खानदेश कन्या. या अर्थाने त्याला स्थानिक संदर्भ आहे. पण आपल्या काव्यातून खानदेशातील लोकजीवन, कृषीसंस्कृती, मानवी जीवनासंबंधीचे तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत मांडणारी ही कवयित्री आहे. तिची कविता कालातीत आहे. मराठी साहित्यात काळावर मुद्रा उमटवणारे ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारखे कवी आहेत. आजही त्यांची अभंगवाणी आणि ओव्या जनमानसात रूजून आहे. बहिणाबाईंची कविताही रसाळ, गेय आणि अलंकृत आहे. मानवी जीवनावर सहज सोपे भाष्य करणारी ही कविता-कवयित्री मराठी साहित्यात आपली मुद्रा उमटवून आहे.

विद्यापीठाला बहिणाबाईचे नाव दिल्याने तिचा लौकिक वाढला असे नव्हे, तर विद्यापीठाचाही हा यथोचित सन्मान झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आधी 13 तालुके होते. 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार एकनाथ खडसे हे मंत्री झाले. त्या शासनाच्या काळात आणखी दोन नवीन तालुके खडसेंच्या प्रयत्नामुळे झाले. बोदवड आणि धरणगाव हे ते दोन तालुके. म्हणजे तालुक्यांची एकूण संख्या 15 झाली. जळगाव, भुसावळ, रावेर, यावल आणि काही प्रमाणात मुक्ताईनगर या तालुक्यांत खानदेशी बोलीभाषा बोलली जाते. पण आता त्याला सरसकट खानदेशी बोलीभाषा असंही म्हणता येत नाही. खानदेशी बोलीभाषा म्हणजे खानदेश प्रदेशाची बोलीभाषा, पण पूर्वी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असा उल्लेख पत्रव्यवहारात केला जायचा. कदाचित तो तेव्हा शासनमान्यही असेल. पूर्व खानदेश म्हणजे जळगाव जिल्हा आणि पश्चिम खानदेश म्हणजे धुळे जिल्हा. त्या काळी खानदेशात हे दोनच जिल्हे होते.

युती शासन आल्यावर महाराष्ट्रात तेव्हा जे काही नवीन तालुके आणि जिल्हे झाले, त्यात धुळे जिल्ह्याचं विभाजन करून नंदुरबार जिल्हा करण्यात आला. या सर्व खानदेश परिसराची बोली भाषा खानदेशी नव्हती. बहिणाबाई चौधरींच्या कवितेची बोलीभाषा खानदेशी आहे असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा त्याचा संदर्भ समजून घेणं महत्त्वाचं आहे. बहिणाबाई या खानदेशातील लेवा पाटीदार समाजाच्या आहेत. जळगाव, भुसावळ, रावेर, यावल आणि काही प्रमाणात मुक्ताईनगर हे तालुके लेवा पाटीदार बहुल तालुके आहेत. आणि या परिसरात लेवा पाटीदार समाजातील लोक जी बोलीभाषा बोलतात, त्याला लेवा गणबोली असे म्हटले जाते. बहिणाबाईंचे माहेर असोदा आणि सासर जळगाव. म्हणजे अधिक काटेकोर बोलायचे झाले तर बहिणाबाईंच्या कवितेची बोलीभाषा ही खानदेशी बोलीभाषा नसून, लेवा गणबोली आहे. पण गंमत अशी की हीच बोली इतर बहुजन समाजाचे लोकही बोलतात. ते या बोलीभाषेशी समरस झाले आहेत. त्यांच्या जीवनशैलीचा तो भाग आहे.

बहिणाबाई कोणत्या समाजाच्या आहेत, याचा जो वर उल्लेख आला आहे, तो केवळ काही संदर्भ स्पष्ट व्हावेत म्हणूनच. अन्यथा बहिणाबाईंना जातीच्या चौकटीत पाहणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. कोणताही प्रतिभावंत कवी-कलावंत हा जात-धर्मापलीकडे असतो, आपणही तसे पाहायला हवे. दुर्दैवाने हे आज प्रत्ययाला येत नाही. बहिणाबाईंचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यामागे राजकीय-सामाजिक समीकरणे असणार नाहीत, असे होऊ शकत नाही. भारतीय लोकशाही अद्याप इतकी प्रगल्भ झालेली नाही. ती जात, धर्म, प्रदेश, भाषा या संदर्भात गटांगळ्या खात असते. हे वास्तव असले तरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देणे स्वागतार्हच आहे. काही लोक याकडे जातीच्या संदर्भातून पाहतील आणि सुखावतीलही, आपण मात्र त्या पलीकडे पाहायला हवे, असे वाटते. याच दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडेही पहावे लागेल. कारण या विद्यापीठांच्या नामांतराच्या मुळाशी जसे राजकीय संदर्भ आहेत, तसे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संदर्भही आहेत, ते दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. किंबहुना सामाजिक जीवनात ते अटळ आणि अपरिहार्य आहेत.

भले-भले अभ्यासक-समीक्षक बहिणाबाईंची कविता अहिराणी बोलीभाषेत आहे असे म्हणतात. वरील मजकुरातून त्यांच्या लक्षात येईल की, ती कविता अहिराणी बोलीतील नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, चोपडा, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, पारोळा या तालुक्यांत अहिराणी बोली मोठ्या प्रमाणात बोलली जाते. शिवाय नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील काही भागातही अहिराणी बोलीचा वावर आहे. पण बहिणाबाईंच्या कवितेची भाषा अहिराणी नाही, हे नक्की.

भुसावळ शहराजवळ तापी नदीच्या पलीकडे भोर नावाचे गाव आहे. या गावात लेवा-पाटीदार समाजाची पंचायत वर्षानुवर्षापासून सुरू आहे. लेवा समाजाची ही पंचायत नियमित भरत असली तरी इतर जातींची, विशेषतः भटक्या-विमुक्त जातींची जी जात-पंचायत असते तशी ती नाही. या भोर पंचायतीत जाती-समाजासमोर असलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला जातो. अनिष्ट प्रथापरंपरांसंबंधी चर्चा होते. समाज काळाबरोबर जायला हवा असा प्रयत्न असतो. अलीकडेच झालेल्या या पंचायतीत समाजातील मुला-मुलींनी आंतरजातीय विवाह करायला हवेत, त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे असा ठराव झाल्याचे ऐकिवात आहे. त्याचवेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे असाही ठराव झाल्याचे कळते. 2012 मध्ये जळगाव येथे अस्मितादर्श साहित्य संमेलन झाले, त्या संमेलनातही हा ठराव मांडण्यात आला होता. महाराष्ट्रात बारमाही अशी छोटी-मोठी साहित्य संमेलने होत असतात. त्यात विविध ठराव मांडले जातात. त्यांचा फार काही परिणाम होत नाही. पण त्यातून जनभावना व्यक्त होतात, हे नाकारता येत नाही. म्हणजे नामकरण व्हावे अशी मागणी समाजातून-परिसरातून होत होती, पण ती आग्रही-आक्रमक नव्हती. त्यासाठी मोर्चे-आंदोलने झाली नाहीत, पण खानदेशातील लोक त्यासाठी सकारात्मक होते. (साने गुरुजी यांची कर्मभूमी अमळनेर. धुळ्याच्या तुरुंगातही गुरुजींना डांबण्यात आले होते. हा संदर्भ लक्षात घेऊन विद्यापीठाला साने गुरुजींचे नाव द्यावे अशीही मागणी अधून-मधून उचल खात होती. पण त्या मागणीमागे जनमताचा रेटा नव्हता. ती अगदीच क्षीण होती. ती मागणी मागे पडली. खानदेशातील साने गुरुजींची शिष्य म्हणवणारी मंडळी आणि समाजवादी साथी यात कमी पडले.)

बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल कवयित्री म्हणून खानदेशातील सर्वच समाजघटकांत आस्था आहे. निरक्षर असूनही त्यांनी आपल्या कवितेतून जीवनविषयक जे तत्त्वज्ञान मांडले आहे, ते अजोड असे आहे. निरक्षरसाक्षर यापेक्षा जन्मजात प्रतिभा काहींजवळ असते. आपल्या संतपरंपरेत हे दिसते. बहिणाबाईंच्या कविता त्यांचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी जतन करून ठेवल्या. खरं तर आपलं समाजमानस काही गोष्टी जतन करण्याबद्दल सजग नसतं, पण सोपानदेव कवी असल्यामुळेच असेल, ‘आपल्या आईनं काही तरी विलक्षण म्हटलेलं आहे’ अशी त्यांना जाणीव होती पण खात्री नव्हती. ते सगळं बोलीभाषेत असल्यामुळेही असेल, त्यांच्या मनात न्यूनभाव होता. सोपानदेव हे आचार्य अत्र्यांचे स्नेही. अत्र्यांचा खंडाळ्याला बंगला होता. सुटी घालवण्यासाठी अत्रे निवडक मित्रांसोबत खंडाळ्याला येत. सोपानदेवही मित्रांच्या मांदियाळीत असत. अशाच एका सुटीच्या कालावधीत सोपानदेवांनी आपल्या आईच्या कविता अत्र्यांना दाखवल्या. त्या वाचल्यावर अत्रे म्हणाले, ‘‘अरे हा तर सोन्याच्या मोहरांचा हंडा आहे.’’ अत्र्यांच्या पुढाकाराने ‘बहिणाबाईची गाणी’ हा संग्रह पुढे प्रसिद्ध झाला. अत्र्यांनी संग्रहाला समर्पक, विवेचक दीर्घ प्रस्तावना लिहिली. महाराष्ट्राला थोर कवयित्री बहिणाबाई चौधरींची ओळख झाली. याचे श्रेय दोन लोकांना, सोपानदेव आणि आचार्य अत्रे यांना.

मृत्यूनंतर बहिणाबाईंच्या कविता प्रसिद्ध झाल्या. बहिणाबाईंच्या कवितांची नोंद वेळोवेळी सोपानदेवांनी केली, हे मोठेच काम त्यांनी केले. ते जतन केले हे त्याहुनही मोठे. निरक्षर बहिणाबाई विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात गेली. आता तर तिच्या नावानेच विद्यापीठ झाले. ही गोष्ट स्वागतार्ह, अभिमान वाटावी अशीच.

Tags: नामांतर देवेंद्र फडणवीस घोषणा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बहिणाबाई चौधरी namantar chalwal namantar bahinabai chaudhari bahinabai university weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मनोहर जाधव,  पुणे ( 27 लेख )
manohar2013@gmail.com

तीन दशके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक राहिलेले मनोहर जाधव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत, त्यांनी कविता व समीक्षा लेखन केले आहे.

 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके