‘---आमची जातिभेदविरहित, धर्मातीत लोकशाही आली आणि तिने शहरातच नव्हे, तर खेडोपाडी जतिद्वेष आणि धर्मद्वेष पसरवला. ही देशाची फार भयंकर हानी झाली आहे’. हा एक गैरसमज आहे. जातिद्वेषाचा आणि धर्मद्वेषाचा नारळ त्यांनी लोकशाहीवर फोडला आहे. इंग्रजांच्या काळात बंधुभाव नांदत असल्याची कितीही मलखाशी केली तरी इतिहास आंधळा नाही! जातिद्वेष आणि धर्मद्वेष हे लोकशाहीने पसरवले म्हणण्यापेक्षा पूर्वी घुमसत असलेल्या जातिद्वेषाला व धर्मद्वेषाला ‘मीही आहे’ म्हणून सांगण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे! इंग्रजांच्या काळात ब्राह्मणी वर्चस्वात राबणारे बहुसंख्य अशिक्षित असल्यामुळे त्यांनी विषमतेने बरबटलेल्या जातीयवादापुढे ‘ब्र’ही काढला नाही, तो त्यांनी प्रकट करायला सुरुवात केली.
अधिक डोळसपणा हवा
‘सामाजिक अन्याय-निवारणाची निकड’ हे श्रीमती मालतीबाई बेडेकर यांचे परखड विवेचन वाचले (साधना ता. 08-12-73). ह्या लेखातला ‘भेदाभेद अमंगळ’ हा जो भाग आहे तो मनाला मुळीच पटत नाही. भेदाभेद अमंगळ आहेत यात वाद नाही, परंतु मालतीबाई जेव्हा ‘इंग्रजाच्या राज्यात आम्ही सर्व जातिधर्माचे लोक बंधुभावाने वागलो’ असा निर्वाळा देतात तेव्हा तो बंधुभाव कोणता हे पाहणे इष्ट ठरते. ब्राह्मण सांगतील तसे ‘ब्र’ न काढताही वागावे, आणि खुशाल गुलामीच्या गर्तेत पडून राहावे, याला जर त्या बंधुभाव म्हणत असतील तर गोष्ट वेगळी. इंग्रजांच्या राजवटीत किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मण वादाचाच नव्हे तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा ज्या समाजाला
जबरदस्त हादरा बसला आहे, त्यालाच विचारून आपणाला सहिष्णुता, बंधुभाव आणि गुणेगोविंदपणा समजू शकेल ! असे विधान करताना डॉ. बाबासाहेबांची दलित मुक्तीची क्रांती त्या सपशेल विसरतात. जर तेव्हा एवढा बंधुभाव होता, तर आंबेडकरांना सवर्ण हिंदूंविरुद्ध उठण्याचे काय वेड लागले होते ?
‘---आमची जातिभेदविरहित, धर्मातीत लोकशाही आली आणि तिने शहरातच नव्हे, तर खेडोपाडी जतिद्वेष आणि धर्मद्वेष पसरवला. ही देशाची फार भयंकर हानी झाली आहे’. हा एक गैरसमज आहे. जातिद्वेषाचा आणि धर्मद्वेषाचा नारळ त्यांनी लोकशाहीवर फोडला आहे. इंग्रजांच्या काळात बंधुभाव नांदत असल्याची कितीही मलखाशी केली तरी इतिहास आंधळा नाही! जातिद्वेष आणि धर्मद्वेष हे लोकशाहीने पसरवले म्हणण्यापेक्षा पूर्वी घुमसत असलेल्या जातिद्वेषाला व धर्मद्वेषाला ‘मीही आहे’ म्हणून सांगण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे! इंग्रजांच्या काळात ब्राह्मणी वर्चस्वात राबणारे बहुसंख्य अशिक्षित असल्यामुळे त्यांनी विषमतेने बरबटलेल्या जातीयवादापुढे ‘ब्र’ही काढला नाही, तो त्यांनी प्रकट करायला सुरुवात केली.
(पुंडलिक घोंगडे, नांदेड)
मुफतका चंदन घिस मेरे लाला
दिल्ली येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘एव्हरीमॅनस’ या साप्ताहिकाच्या अंकात, मध्यप्रदेश राज्याच्या मंत्र्यांनी अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत ( फेब्रुवारी 72 ते डिसेंबर 72 ) आपापल्या बंगल्यावर दुरुस्तीसाठी खालीलप्रमाणे (वारेमाप) खर्च केला आहे असे प्रसिद्ध झाले आहे.
रुपये
श्री पी. सी. सेठी, मुख्यमंत्री 2,58,165
श्री के. एल. शुक्ला, महसूलमंत्री 45,955
श्री एस्. एस्. मुशरन्, वित्तमंत्री 40,392
श्री बी. आर. चतुर्वेदी, पंचायत मंत्री 40,275
श्री उमरावसिंग, सहकारी मंत्री 36,906
श्री अर्जुनसिंग, शिक्षणमंत्री 36,743
श्री पी. एन्. पटेल, उद्योगमंत्री 36,065
श्री के. पी. सिंग, विधिमंत्री 35,584
श्री सी. पी. त्रिवेदी, नियोजनमंत्री 33,192
वरील मंत्र्यांच्या बंगल्यात दोन वातानुकूलित खोल्यांची सोय करण्यात आलेली असून, त्यामध्ये एक शयनगृह व दुसरे कार्यालय आहे. याशिवाय सचिवालयामध्येही प्रत्येक मंत्र्यास वातानुकूल खोली कार्यालयासाठी करून देण्यात आली आहे.
पण मुख्यमंत्री व इतरही मंत्री हे क्वचितच राजधानीत असल्यामुळे ह्या वातानुकूल खोल्यांचा विशेष उपयोग होत नसावा. प्रतिष्ठेचा हा जबर भुर्दंड गरीब देशाला काय म्हणून ?
(कु. स्मिता वैद्य, कल्याण)
तीन महत्वाचे लेख
‘मुक्काम नागेपल्ली’ हा प्रा. (सौ.) सुलभा भानगावकर यांचा लेख वाचला. हा लेख उत्साहाने लिहिला आहे. लेखिकेसमवेत स्वतः कॅम्पमध्ये उपस्थित असल्यासारखे वाटते. निरोपाच्या वेळची श्री. बाबा व सौ. साधनाताईंची वागणूक वाचून त्यांच्या बद्दलचा आदर आणखी दुणावला. कॅम्पचे सजीव चित्रण केल्याबद्दल सौ. भानगावकर यांना धन्यवाद.
‘इतिहास आम्हा सर्वांनाच क्षमा करणार नाही’ हे श्री दे. कृ. बढे यांचे लिखाण आवडले. ‘टपाल’ या सदरात प्रसिद्धी न देता आपण ती अन्यत्र यावयास हवी होती. ‘टपाल सदर सर्वांकडून वाचले जाते असे नाही. त्याचप्रमाणे ‘चटका लावणारा पत्रव्यवहार’ प्रसिद्ध आपण एका महत्त्वाच्या विषयास वाचा फोडली. शासनाने याचा सहानुभूतीने विचार करावा.
रवीन्द्र टपळे, ओझ, ता. वाई
कुलगुरू आणि मुसा
मराठवाडा विद्यापीठात फी वाढीविरुद्ध ‘मुसा’ संघटनेने कुलगुरू श्री. आर. पी. नाथ यांना घेराव घालून जे वर्तन केले ते अत्यंत निंद्य आहे. वास्तविक फीवाढी विरुद्धचा घेराव, पण ‘मुसा’ने पाउले उचललेली जातीय दृष्टिकोणाची ! गुलमंडीवर झालेल्या सभेतील भाषणे म्हणजे शुद्ध जातीयवादाने आणि कुलगुरू श्री. नाथ यांच्याविषयीच्या द्वेषाने भरकटलेली होती.’विद्यापीठाचा महारवाडा’ झाला. या भाषणात जसे जहरी विष होते तसेच ‘मुसा’च्या घेरावास आहे! यावरून मुसाला फी वाढीशी काही कर्तव्य नसून कुलगुरूंना बदनाम कसे करावे असेच वाटते आहे. अर्थात या कामी काही राजकीय पुढारी व पाताळयंत्री प्राध्यापक कारणीभूत आहेत. ‘मुसा’ने एक गोष्ट लक्षात घ्यावी की, चालू परिस्थितीवरून पाहता ‘खेळ होतो पुढाऱ्यांचा आणि जीव जातो विद्यार्थ्यांचा..’ ‘मुसा’ राजकीय पक्षांचे आणि पाताळयंत्री प्राध्यापकांच्या हातचे बाहुले बनू नये. खरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न मुसाला हाताळावयाचे असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यावे. गुंडगिरी आणि जातीयवाद निर्माण करून विद्यार्थ्यांचा विश्वास आणि सहानुभूती गमावू नये.
(एक विद्यार्थी मित्र
दयानंद कॉलेज, लातूर)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या