डिजिटल अर्काईव्ह

स्वर्गीय नाथ पै- एक पुरुषोत्तम : काही आठवणी

विद्वानाची पगडी आणि सामान्य माणसाचे अंतःकरण एकदमच हलायचे!
 

नाथ पै च्या स्वर्गवासाला यंदाच्या 18 जानेवारीला 12 वर्ष पूर्ण होतील. अनंतकालात विलीन झाली तरी नाथची स्मृती जनमानसात टपोऱ्या सुगंधी गुलाबपुष्पाप्रमाणे ताजी टवटवीत आहे, कारण नाथचे व्यक्तिमत्त्व असामान्य स्वरूपाचे. सर्वस्पर्शी. तो जितका विद्वान माणसांना प्रिय, तितकाच साध्याभोळ्या निरक्षर खेडुतांचा आवडता. मातृभक्त मुलगा, प्रेमळ पती, पिता नि बंधू याही जबाबदाऱ्या त्याने सांभाळल्या याचेही आश्चर्य वाटते. कारण अनेक व्यापांमुळे त्याला क्षणाचीही फुरसत नसे. अनेक राजकारणी माणसे कशी बनतात, पण राजकारणाच्या वैराण वाळवंटात नाथची विद्वत्ता नि रसिकता ही कधीच कोमेजली माहीत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेसारखे प्रगाढ पंडित त्याच्या विद्वत्तेवर जितके लुब्ध, तितकेच कविवर्य बोरकरांसारखे कवी आणि पु. ल. देशपांडे यांच्यासारखे साहित्यिक त्याच्या रसिकतेवर निहायत खूष असत. नाथ लोकसभेत बोलू लागला- त्याचे वाक्संगीत मुरूमाले-की आपल्या चेंबरमध्ये बसलेले पंतप्रधान पं. नेहरू झटकन लोकसभेतील आपल्या जागेवर यऊन बसत. पं. नेहरूंना त्याचे भाषण ऐकण्याची जी उत्कंठा होती, तीच उत्सुकता लांजे-राजापूर तालुक्यातील लंगोटीवाल्या कुणबी शेतकऱ्यांनाही होतो. राजकीय नेत्यांना आपल्या ज्ञानाने आणि वाक्चातुर्याने चीत करणारा हा तरुण रस्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयातील सहकाऱ्यांशी इतक्या खेळीमेळीने थट्टामस्करी करो, की ' हेच का ते खासदार बॅ. नाथ पै?' असा संभ्रम पडावा! हे पाहिल्यावर हे विलक्षण रसायन विधात्याने एका दिव्य मूर्तीत ओतून हा सजीव सुंदर पुतळा निर्माण केला होता, असे वाटे. नायच्या आयुष्याची 48 वर्षे पुरी झाल्यावर काही महिन्यांतच कर नियतीने त्याच्या जीवनाचा लोभसवाणा कट फाडून टाकला, त्याच्या सदाप्रसन्न वृत्तीचा तिला फार हेवा वाटला असावा. नाथचे भाषण ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनावर मांगल्याची छाप पडत असे. काही तरी चांगले कार्य करावे, अशी प्रेरणा त्यांना मिळे. लाखो लोक त्याची अमृतवाणी ऐकून सुखावले आहेत. सुमारे पंधरा वर्षे दर वर्षी नाथच्या निकट सहवासात काही दिवस घालविण्याचे भाग्य कोकणातील अनेक तरुणांना लाभले. त्यामधील मी एक. त्याच्या जीवनपटातील अनेक दृश्ये अगदी जवळून पाहता आली. त्यापैकी काही दृश्ये पुढे ठेवीत आहे.

पहिली नि दुसरी भेट

 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे मी बेळगाव नजीकच्या हिंडलगा कारागृहात होतो. तेथे दहा महिने राहिल्यावर माझी बदली नगर जिल्ह्यातील विसापूर जेलमध्ये झाली, पण एकदम तेथे न पाठविता बेळगाव फोर्ट जेलमध्ये काही राजबंद्यांसह मला चार पाच दिवस ठेवले. नाथ तेथे आपल्या सहकाऱ्यांसह कच्च्या कैदेत होता. खटला चालू होता. ओठावर नुकती कुठे तुरळक मिसरूड फुटू लागलेली. भूमिगत अवस्थेत रानावनांत फिरल्यामुळे देह कृश नि काळसर झाला होता. पण पाणीदार डोळे तेजस्वीपणे चमकत असत. तेथेही वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तुरुंगातील सर्व राजबंद्यांचा तो नेता होता. 'स्वय-मेव मृगेंद्रता'- हेच खरे! नाथच्या भूमिगत कार्याविषयी हिंडलगा जेलमध्ये आम्ही खूप ऐकले होते. लोकरच आमची मैत्री जमली. तिचे पुढे गाढ स्नेहात रूपांतर झाले. 1956 साली तेरा वर्षांनंतर मुंबईत दुसरी भेट झाली. मी समाजवादी पक्ष कचेरीत प्रवेश करताच 'या गुरुजी' असे म्हणत नाच धावतच पुढे आला! आता तो अंगाने थोडा भरला होता. इंग्लंडमधील चार वर्षांच्या वास्तव्यामुळे थोडासा गोराही दिसू लागला होता. मी ओळखला नाही. क्षणभर गोंधळलो. बबन डिसोझाने म्हटले 'नाथ!' आणि उलगडा झाला. माझी. स्मरणशक्ती जितकी अधू तितकीच नाथची तीव्र. एकदा भेटलेल्या कार्यकर्त्यंचे नाव, पाव व काम त्याच्या लक्षात पक्के राही. जबरदस्त स्मरणशक्तीचे त्याला वरदानच होते.

नाथपुढे 'ह्यां'चा टिकाव नाही

11957 च्या निवडणुकीचे दिवस. आवेदन-पत्र भरून झाल्यावर त्याच दिवशी रत्नागिरी येथील जाहीर सभेत नाथचे भाषण झाले. मंत्रमुग्ध करणारे ते भाषण ऐकल्यावर श्रोते म्हणू लागले, 'दादा शिखरे आणि भाई सेटचे यांचे आभार मानले पाहिजेत. दक्षिण रत्नागिरीसाठी त्यांनी किती लायक उमेदवार आणला!' त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी लोकांच्या खास आग्रहावरून नाथ दुसरे भाषण मी रत्नागिरीस ठेवले. त्याच दिवशी मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर निवर्तल्याची दुःखद बातमी आली. नाथ म्हणाला, 'दादा, बाळासाहेबांच्या निधनामुळे आज मी भाषण करणार नाही. सभेला येतो. मग सभा रद्द करायची.' मी थोड्या निराशेने म्हटले 'ठीक आहे.' माझी नाराजी पाहून नाथ म्हणाला, 'उद्या येथे सभा जाहीर करा. पुढील कार्यक्रम एका दिवसाने पुढे ढकलले आहेत अशा तारा करा किंवा फोन करा!' रात्री जाहीर सभेत आज आपण व्याख्यान का देणार नाही, याबद्दल नाथने सांगितले. उद्या नाथ भाषण करतील असे मी जाहीर केल्यावर श्रोत्यांची निराशा दूर झाली. ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. मोरोपन्त जोशी या निवडणूकीत काँग्रेसतर्फे उभे होते. त्यांच्या पत्नी के. ताई दोन्ही साना उपस्थित होत्या. पहिली सभा रद्द करण्यायमागील नाथच्या मनाचा मोठेपणा पाहून त्या अतिशय प्रभावित झाल्या. दुसन्या सभेतील नाथचे भाषण ऐकून भारावून गेल्या. आपल्या मैत्रिणींना ताईंनी सांगितले, 'नाथ प हाडाचा सज्जन माणूस दिसतो. वक्तृत्व तर अलौकिक. या माणसापूढे बामच्या 'या'चा टिकाव लागणे शक्य नाही.' ताईची भविष्यवाणी खरी ठरली.

आगळे व्रक्तृत्व

प्रसंग आहे विजयदुर्ग येथील सभेचा. तेथील एक ग्रामस्थ श्री. शामराव परुळेकर यांनी आपल्या प्रशस्त दिवाणखान्यात सभा योजली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठी जनतेवर झालेल्या अत्याचारांचे आपल्या भाषणात नाथने वर्णन सुरू केले आणि श्रोत्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याचे मला विशेष काही वाटले नाही. कारण ते नेहमीचे दृश्य होते. पण शामराव परुळेकर हे एक मिस्कील स्वभावाचे गृहस्य आहेत, हे दीर्घ परिचयावरून मला माहीत होते. त्यांच्याही गाडांवरून अश्रु ओघळत आहेत हे जेव्हा मी पाहिले त्यावेळी मला आश्चर्य वाटले. सभा आटोपल्यावर मी नाथला म्हटले, 'आज तुझ्या शब्दांच्या सामर्थ्याची खरी प्रचिती आली. एका मिस्कील वृत्तीच्या गृहस्थांना- शामराव परुळेकरांना-तू अक्षरशः रडविलेस.' नाय विनयाने म्हणाला, 'हे माझ्या शब्दांचे सामर्थ्य नसून त्या हॉलचे - सामथ्र्य आहे. बंदिस्त सभागृहातील सभा खऱ्या अर्थाने परिणामकारक होतात. कारण तेथे वक्ता नि श्रोते यांचा सुसंवाद होतो. मैदानातील जाहीरसमांत ही गोष्ट होऊ शकत नाही. इंग्लंडमधील सभा बंद सभा-गृहातील असतात. मोठ्यांत मोठी समा म्हणजे सुमारे पाचशे श्रोत्याची. पण प्रत्येक श्रोता जाणकार असतो. वक्ता थापा मारू लागला तर एखादा श्रोता लगेच त्याला योग्य प्रश्नांनी अडवू शकतो.'

पुऱ्यांत हवा कशी भरतात?

1957 च्या डिसेंबरमधील एक दिवस.पार्लमेंटमधील आपल्या भाषणांनी नाथचे नाव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर अखिल भारतात गाजू लागले होते. आपल्या मतदारांना आपल्या कामाचा अहवाल सादर करण्यासाठी नाथचा हा दौरा होता! सॅम्पएल मलार्क नावाच्या एका अमेरिकन प्राध्यापकान नाथचे पार्लमेंटमधील एक भाषण ऐकले होते. हा भारतीय माणूस इतके सुंदर इंग्रजी कसे बोलतो याचे राहून राहून त्याला नवल वाटायचे. आपल्या मराठी भाषिक लोकांपुढे नाथ कसा बोलतो हे त्याला ऐकायचे होते. नायकडे या दौऱ्यात बरोबर येण्याची त्याने विनंती केली होती आणि नाथने ती मान्य केली होती. सावंतवाडी शहर नाथच्या मतदार संघात नसले तरी वाडकर आणि नाथ यांचा जिव्हाळा लक्षात घेऊन पहिली सभा मी सावंतवाडोत ठेवली. नेहमीप्रमाणे नाथचा जिवलग स्नेही राजाराम बाळके यांचेकडे निवास व भोजनव्यवस्था होती. जेवताना गरगरीत फुगलेल्या पुऱ्या पाहून प्रा. क्लार्क मला म्हणाला, ' या पुऱ्यामध्ये हे लोक हवा भरतात तरी कशी बुबा?" सर्व हसू लागले. क्लार्क जरा ओशाळल्यासारखा झाला. नाथ म्हणाला, 'यजमानाची बायको जेवणानंतर त्याचे प्रात्यक्षिक दाखविल!' मग नाथ राजारामच्या पत्नीला म्हणतो, 'वैनी, जरा तुका त्रास दितंय. पुऱ्यात हवा कशी भरतत, ती या सायबाक दाखव!' जेवणानंतर राजाराम वाळके यांच्या पत्नीने पुऱ्या कशा करतात याचे साग्रसंगीत प्रात्यक्षिक दाखविले. ते सर्व बारकाईने पाहिल्यावर प्रा. कलाके म्हणाला, 'ही कृती किती आश्चर्यकारक व सोपीही आहे!

माझ्यामागे कोण हे पहातो

राजापूर लोकसभा मतदारसंघातून 1957 ,196 2 व 1967 असा लागोपाठ तीन वेळा प्रचंड बहुमताने नाय निवडून झाला होता. 196 2 मधील ही हकीकत. नाथपुढे सामान्य उमेदवाराचा टिकाव लागणार नाही, या मतदारसंघात अखिल भारतीय प्रसिद्धीचा उमेदवार उभा केला पाहिजे या निर्णयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आली होती. एका काळचे मुंबईचे अनभिषिक्त राजे कै. स. का. पाटील यांचे नाव या संदर्भात घेतले जात होते. राजापूरचे एक कार्यकर्ते श्री. बाबा देसाई नाथला म्हणाले, 'तुमच्याविरुद्ध स. का. पाटील याना काँग्रेस उभी करीत आहे, असे आम्ही ऐकतो. खरे का?' नाथ उत्तरला, 'मीही तसे ऐकतो आहे. नक्की माहीत नाही. पण माझा प्रतिस्पर्धी कोण आहे, या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. माझ्यामागे-माझ्या पाठीशी-कोण आहेत, या गोष्टीचे मला महत्त्व आहे. जोपर्यंत तुमच्यासारखे कार्यकर्ते खंबीरपणे माझ्यामागे उभे आहेत तोपर्यन्त समोर कोण येतो याची मला चिंता नाही.'

माड झाड म्हणजे मुलेच

1962 व 1966 मध्ये रत्नागिरी जिल्हयास चक्रीवादळाचे जबरदस्त फटके बसले आणि कोट्यवधी रुपयांची हानी झाली. रेडिकोवरून हे वृत्त कळताच दिल्लीतील आपली सर्व कामे बाजूस ठेवून नाथ लगबगीने जिल्हयात आला. नाथ अत्यंत व्यचित झाला होता. एका जाहीर सभेत बोलताना तो म्हणाला, 'माड आणि ही आंब्या-फणसांची झाडे, विशेषतः कलमे म्हणजे शेतकऱ्याची मूलेच. तीच आज मोडून पडली आहेत. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा मी शिकस्तीचा प्रयत्न करीन.' है हृदयस्पर्शी उद्गार ऐकून शेतकऱ्यांची हृदये हेलावली.

कार्यकत्यांविषयी आपुलकी

आपल्यापेक्षा वयाने वडील असलेल्या कार्यकर्त्याविषयी नाथच्या मनात आदरभाव असे, तर समवयस्कांबद्दल समानतेची, गुणग्राहकतेची भावना, कार्यकत्यांनी आपणास एकेरी नावा-नेच संबोधावे असा त्याचा कटाक्ष होता नाना तारी आपला अनुभव सांगतो, 'बांदे येथील एका सभेत माझ्या कार्याची नाथने प्रशंसा केली. त्या सभेला माझे वडील हजर होते. माझ्या अल्पस्वल्प सार्वजनिक कार्यामुळे, मी एक फुकट गेलेला मुलगा अशी माझ्याविषयी त्यांची कल्पना झाली होती. पण बालिस्टर नाथ आपल्या पोरग्याविषयी इतके चांगले बोलत आहे हे प्रत्यक्ष ऐकल्यावर त्यांचे माझ्याविषयीचे मत एकदम पालटले. तेही माझ्या कामांत होईल ते साह्या मला करू लागले. नाथचे कार्यकत्यावर निरतिशय प्रेम असे आणि तेही त्याला भरघोस प्रतिसाद देत असत. 1971 च्या निवडणुकीच्या वेळी तो आधिक अडचणीत होता. कणकवलीचे माजी सभापती मामा आळवे म्हणाले, 'नाथ, घाबरतोस का? बायकोचे दागिने विकीन आणि निवडणूक खर्चाला पैसे उभे करीन. काही काळजी करू नकोस.'

पालखीवालांशी वाग्यूध्द्ध

निधनापूर्वी तीन वर्षे नाथने पटना दुरुस्ती बिलाचा ध्यासच घेतला होता. 1968 च्या मार्च महिन्यातील एक संध्याकाळ. नाथला रत्नागिरी जिल्हयात दौऱ्यावर आणण्यासाठी मी मुंबईत गेलो होतो. आम्ही मुंबई सोडण्याच्या आदल्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या प्रशस्त अशा दीक्षान्त सभागृहात वरील विषयावर बॅ. नाथ पै व बॅ. नानी पालखीवाला यांचा तो संस्मरणीय वादविवाद झाला. तो ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते धन्य होत. दोघेही इंग्रजी भाषेतील पट्टीचे वक्ते व घटनातज्ज्ञ. एकमेकांविषयी असलेला खराखुरा आदर दोषांनीही आरंभीच्या प्रास्ताविकात गोड शब्दांनी व्यक्त केला व नंतर आपले शरसंधान सुख केले. ती एक बवीट अशी बौद्धिक मेजवानी होती. गोलकनाथ दाव्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अविकाराचे उल्लंघन करून काही विशिष्ट बाबतीत कायदे करण्याचा पार्ल मेंटचा अधिकारच संपुष्टात आणला; जनतेच्या हक्कावर गदा आणली; असे नाथचे मत होते. सुप्रीम कोर्टाच्या अधिकारावर पार्लमेंटनेही अतिक्रमण करू नये, असे नाथने स्पष्टपणे सांगितले. पालखीवाला यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले, नाथच्या निर्याणानंतर पार्लमेंटने नाथचे ते विधेयक संमत केलेले असले तरी अजूनही तो विषय वादग्रस्त आहे. त्या सायंकाळी थोत्यांमध्ये मुंबईतील बहुसंख्य वकील व कायद्याचे विद्यार्थी उपस्थित होते. मतदान ध्यायचे नव्हते. पण घेतले असते तर नाथच्या बाजूने मताधिक्य झाले असते, असे नाथला वारंवार मिळत असलेल्या टाळ्यांवरून स्पष्ट दिसत होते. घटनाशास्त्राच्या आपल्या नैपुण्याने आणि इंग्रजीतील वक्तृत्वशैलीने त्या दिवशी त्याने बुद्धिमंतांना जिंकले.

कोकणसाठी प्राणावर उदार

दरिद्री कोकणचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नाथचे प्रयत्न सतत चालू असत, 1969 च्या ऑक्टोबर महिन्यात कोकण विकास परिषदेचे एक खास अधिवेशन घेण्यात त्याने जातीने पुढाकार घेतला. कोकणचे एक सुपुत्र माजी केंद्रीय अर्थमंत्री चितामणराव देशमुख आणि जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रश धनंजयराव गाडगीळ यांना मार्गदर्शनासाठी नाथने बोलावले. नाथचा शब्द त्यांनी खाली पडू दिला नाही, पण अधिवेशनापूर्वी चार-पाच दिवस दिल्लीत नायला हृदयविकाराचा जबरदस्त झटका आला व रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. मुंबईला जाण्यास डॉक्टर परवानगी देईनात. अधिवेशनाची जागा मुंबईत होती. आपण एवढे थोर पाहुणे अधिवेशनास बोलाविले आहेत, मग स्वतः गैरहजर राहून कसे चालेल? शरीराबरोबर त्याच्या मनाचीही तडफड चालू होती. शेवटी त्याने अधिवेशनाला उपस्थित राहाण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर कळवळून म्हणाले, आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जात आहा, हे लक्षात ठेवा.' मो रत्नागिरीहून नाथच्या खास पत्राप्रमाणे या अधिवेशनास गेलो होतो. परेल येथील नरे पार्कचे मैदान श्रोत्यांनी तुडूंब भरून गेले होते. बबन डिसोझा आणि दुसन्या एका कार्यकांच्या खांद्यावर हात टाकून नाथ एक एक पाऊल कष्टाने उचलून व्यासपीठाकडे चालला होता. त्याला श्वास लागला होता. कुडीतील प्राण कधी बाहेर पडतील याचा नेम नव्हता. तरीही थांबत थांबत त्याने सुमारे 15 मिनिटे भाषण केले आणि वर उल्लेखिलेल्या दोन्ही पाहुण्यांस धन्यवाद दिले. प्रत्यक्ष भेटल्यावर नाथ नेहमीप्रमाणे सारखा बोलत राहणार, त्याचा त्याच्या नाजूक प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होईल म्हणून श्री बाबूराव आढारकर यांचे घरी त्याला भेटायला न जाता मी सरळ रत्नागिरीची वाट धरली. तिसऱ्या दिवशी नाथचे पत्र आले. 'दादा, तुम्ही मला भेटायला का आला नाही? आता मी खूप बरा आहे. आपल्या ध्येयाच्या नि कामाच्या आड येत नाही, तोपर्यंतच डॉक्टरांचा सल्ला मानावयाचा असतो.' तिसरे वाक्य समाजवादी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या 1974 च्या दैनंदिनी-मध्य प्रारंभी छापले आहे.

आपल्या ध्येयासाठी प्राणांची कुर्बानी करण्यास सदैव सिद्ध असलेला असा हा नाथ त्याची थोर परंपरा खासदार मधु दंडवते आणि खासदार प्रमिला दंडवते निर्धाराने पूर्वे चालवीत आहेत. नाथ पै सेवांगणा'चे सर्वश्री ज्ञानेश देऊलकर, तु.शं. पेडणेकर, मधु वालावलकर, बाबुराव अक्सरे आदी कार्यकर्ते मालवण येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर नाथचे एक भव्य स्मारक उभारण्याची धडपड गेली दोन वर्षे करीत आहेत. नाथप्रेमी माणसांनी त्या कार्याला सढळ हातांनी मदत केली पाहिजे.

Tags: आठवणी समाजवादी समाजवाद भारतीय स्वातंत्र्यलढा नाथ पै Memories Socialism Socialist British Freedom Struggle Nath Pai #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी